विजय माहुरे
सेलू,
Selu Nagar Panchayat ज्या नगर पंचायतला स्वच्छतेचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला त्याच शहरात अस्वच्छता असावी ही शोकांतिका नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वतःची प्रतिमा झळकावणार्या सेलू नगर पंचायतच्या कारभाराचा फोलपणा आता उघड झाला आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून नाल्यांची साफसफाईच न झाल्याने बहुतांश ठिकाणी सांडपाणी रस्त्यावर वाहत असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचे जगणे त्रासदायक बनले आहे. शहरातील अनेक समस्या बाबत नागरिक चुप्पी साधून आहे. शहरातील नाल्या गाळ व प्लास्टिक आणि कचर्याने तुडुंब भरल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे. नाल्यांच्या दुर्गंधीमुळे घरात बसणेही कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी डासांचा प्रचंड त्रास होत असल्याने साथींचा धोका वाढल्याची भीती आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शहरात गेल्या दोन वर्षांपासून फॉगिंग किंवा कीटकनाशक फवारणीच करण्यात आलेली नसल्याचा आरोप होत आहे.
रेतीचा साठा अन् वाढलेली झुडपं
सेलू शहरात पडलेल्या लेआऊट मधील काही भूखंड खाली असून या भूखंडावर वाढलेली झाडे झुडपे सरपटणार्या प्राण्यांना वाव देत आहे. एका लेआऊटमध्ये रेतीचे लागलेले मोठ मोठे ढीग लागले आहेत. त्यामुळे या लेआऊट मधील रस्त्याने चालणारी जड वाहने रस्त्याची ऐशी तैशी करीत आहे. Selu Nagar Panchayat याकडे नगर पंचायतचे दुर्लक्ष आहे. रेतीचा साठा करणार्या विरोधात महसूल विभागाची कुठेही कारवाई होताना दिसत नाही. जड वाहनांमुळे रस्ते खराब होत असेल तर नगर पंचायत बघ्याची भूमिका का घेत आहे असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
गावात घंटागाडी
सेलू आता गाव राहिलेले नाही शहर झाले आहे. पण आरोग्याच्या दृष्टीने फॉगिंग मशीन द्वारे फवारणी, खाली भूखंडाची स्वच्छता, नियमित नाली सफाई याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. Selu Nagar Panchayat शहरात घंटा गाडी फिरत असल्याचे दिसत असले तरी त्यामुळे शहर स्वच्छ राहते काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.