कोलकाता,
Kakoli Ghosh Dastidar's Resignation पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) मधील अंतर्गत अस्थिरता अधिकच वाढताना दिसत आहे. पक्षाच्या ज्येष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कल्याणी येथे झालेल्या प्रशासकीय आढावा बैठकीत त्या सहा आमदारांसह उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीचे नेतृत्व मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केल्याची माहिती समोर आली असून, टीएमसीमधील काही नेत्यांच्या या उपस्थितीमुळे पक्षांतर्गत नाराजी अधिक स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे.
काकोली घोष दस्तीदार यांनी पक्षातील वागणुकीवर नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत काही आमदारांनीही विविध कारणांमुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत वेगळा मार्ग स्वीकारल्याची चर्चा आहे. या घडामोडीनंतर टीएमसीचे ज्येष्ठ नेते कल्याण बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर सूचक प्रतिक्रिया देत अप्रत्यक्ष टीका केल्याचे दिसून आले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील अनेक नगरपालिकांमध्ये राजीनाम्यांची मालिका सुरू झाली असून, सुमारे १०० नगरसेवकांनी पदत्याग केल्याची माहिती आहे. या राजकीय अस्थिरतेचा फायदा भाजपला होत असल्याचेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.