आदिवासी क्षेत्रात सांस्कृतिक अस्मिता जागृत होणे गरजेचे

    दिनांक :26-May-2026
Total Views |
- जनार्दन हेगडकर : ‘नाटक एके नाटक’ कार्यशाळेचा समारोप

गोंदिया, 
‘Natak Eke Natak’ जंगलातील नक्षलवाद संपुष्टात आला असून आता या भागात शिक्षण आणि विकासाची नवी दारे उघडत आहेत. मात्र, यासोबतच नक्षलग्रस्त आणि आदिवासी क्षेत्रातील मुलांमध्ये कला-संस्कृतीची ओढ निर्माण करून त्यांच्यासाठी जगाचे व्यासपीठ खुले करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन चिचगड पोलिस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांनी केले.
 
 
Natak
 
‘Natak Eke Natak’  गोंदिया जिल्हा पोलिसाच्या ‘दादालोरा खिडकी’ योजनेअंतर्गत डॉ. दंदे फाउंडेशन आणि हेमेंदू रंगभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नाटक एके नाटक’ या सात दिवसीय नाट्य कार्यशाळेचा समारोप रविवारी देवरी तालुक्यातील चिचगड येथील श्रीराम विद्यालय येथे रंगतदार नाट्य सादरीकरणाने झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार जनार्दन हेगडकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून वामन देशमुख, लक्ष्मीकांत जाटवे, सुधाकर मस्के आणि प्रवीण खापरे उपस्थित होते. 17 मेपासून सुरू झालेल्या या कार्यशाळेत चिचगड परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक, भाषा शुद्धी, अभिनय, नेपथ्य आणि मेकअप यासारख्या रंगमंचीय कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. समारोप सोहळ्यात शिबिरार्थ्यांनी ‘एक पुडीची किंमत’, ‘स्वच्छ भारत’ या नाटिका तसेच ‘लाईट गेली’ हे मुकनाट्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर मस्के यांनी केले, तर आभार पल्लवी काळे (मूलमुले) यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी पोलिस अधिकारी व हेमेंदू रंगभूमीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.