हिंगणघाट,
No Encroachments at Nandori Square कोरोना काळात नागरिकांची गर्दी विभागण्यासाठी शहरातील नंदोरी चौक तसेच डॉ. आंबेडकर शाळेसमोर तात्पुरत्या स्वरूपात काही भाजी विक्रेत्यांना दुकाने लावण्याची परवानगी देण्यात आली होती. गेल्या ५ वर्षांत या भागात अतिक्रमणाने भीषण रूप धारण केले होते, परंतु अलिकडेच पालिका व पोलिस प्रशासनाने धारिष्ट दाखवून येथील अतिक्रमणधारकांना हुसकावून लावले. आता भविष्यात अतिक्रमणास थारा देऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांनी प्रशासनाकडून व्यत केली आहे. नंदोरी चौक आणि डॉ. आंबेडकर शाळेसमोर तात्पुरत्या स्वरूपात भाजी विक्रेत्यांना दुकाने लावण्याची परवानगी स्थानिक आमदार, तत्कालीन नगराध्यक्ष आणि प्रशासनाच्या समन्वयाने देण्यात आली होती. मात्र, डॉ. आंबेडकर शाळेसमोरील रस्ता आधीच अरुंद आणि एकेरी वाहतुकीचा असल्याने तसेच या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे तिथे भविष्यात अतिक्रमण वाढू न देणे ही पालिका व पोलिस प्रशासनाची जबाबदारी होती. परंतु, कोरोनानंतर पाच वर्षांचा कालावधी लोटूनसुद्धा अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले; त्यामुळे अतिक्रमण धारकांचा स्वार्थ महत्त्वाचा की आम जनतेचा जीव? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला होता.

मुठभर लोकांच्या आर्थिक फायद्यासाठी हजारो शाळकरी मुले, कॉलेज व ट्यूशनला जाणारे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि वयोवृद्ध नागरिकांना दररोज जीवघेण्या वाहतुकीचा सामना करावा लागतो. रस्त्याच्या कडेला पादचार्यांना चालायला जागा उरली नाही. त्यामुळे पाठीमागून बस किंवा इतर वाहनांची धडक बसून अपघात होण्याची शयता बळावली होती. काही दिवसांपूर्वी अतिक्रमण हटवण्याऐवजी प्रशासनाने थेट येथील बस थांबाच रद्द करण्याचा जनताविरोधी निर्णय घेतला होता. पोलिसांच्या सूचनेवरून आगार प्रमुखाने घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला. नागरिकांचा वाढता रोष पाहून अखेर प्रशासनाला नमते घेऊन स्वतःचा निर्णय मागे घ्यावा लागला.
नुकतेच हे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. रस्ता मोकळा झाल्याने वाहनधारकांनी सुटकेचा श्वास घेतला. मागील काही दिवसांतील भीषण अपघातांची पृष्ठभूमी बघितल्यास शहरात व नजीकच्या परिसरात घडलेल्या दोन मोठ्या अपघातांमध्ये आई-वडील आणि मुलीसह ५ जणांचा जीव गेला. अशा गंभीर परिस्थितीतही जर पुन्हा अतिक्रमणाला प्राधान्य दिले गेले आणि एखादी मोठा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे. आता अतिक्रमणाला कायमस्वरूपी बंदी घालावी. नंदोरी चौकात आता भविष्यात कधीही अतिक्रमण नकोच! हीच नागरिकांची मागणी आहे.