दिग्रस,
Umarkhed Sukli उमरखेड तालुक्यातील सुकळी येथे गोवंश तस्करीच्या संशयावरून गोरक्षक गजानन सुरोशे यांची झालेली निर्घृण हत्या ही अत्यंत निंदनीय, संतापजनक आणि समाजमनाला हादरवून टाकणारी घटना असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत ‘आम्ही दिग्रसकर’ संघटनेच्या वतीने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या घटनेतील सर्व आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवावा तसेच दोषींना फाशी अथवा जन्मठेपेची कठोर शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे.
या संदर्भात संघटनेच्या वतीने तहसीलदार मयूर राऊत यांना मुख्यमंत्री यांच्या नावे शेकडो नागरिकांच्या स्वाक्षरीसह निवेदन सादर करण्यात आले. सुकळी येथे गोवंशाची अवैध तस्करी करणाऱ्या समाजकंटकांकडून गजानन सुरोशे यांची दिवसाढवळ्या झालेली हत्या ही कायदा-सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारी असून, पुरोगामी महाराष्ट्रात अशी घटना घडणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील आरोपींवर Umarkhed Sukli कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच समाजात अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
तहसीलदार मयूर राऊत यांना निवेदन देताना नगर परिषद उपाध्यक्ष सचिन बनगिनवार, अजिंक्य मात्रे, भाजपा शहराध्यक्ष अभय इंगळे, उबाठा शिवसेना शहराध्यक्ष राहुल देशपांडे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.