वर्धा,
'swarajya sanstha' vidhan parishad nivadanuk वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक १६ जून रोजी होत आहे. यामध्ये मतदार म्हणून ४५० नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांची नावे मतदार यादीत आहे. त्यांनाच मतदानाचा अधिकार आहे. मतदार यादीत ज्यांचे नाव आहे त्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांनाच विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊन आमदार होण्याची संधी द्यावी अशी मागणी वर्धा नगरपालिकेचे माकपाचे नेते व नगरसेवक यशवंत झाडे यांनी केली आहे.
आजपर्यंत राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांचे, ज्येष्ठ नेत्यांचे पुनवर्सन करण्याकरिता उमेदवारी देत होते असा अनुभव आहे. नंतर निवडून आलेला विधान परिषद आमदार कोणत्याही नगरसेवकाला, जिल्हा परिषद सदस्यांना साधी भेटही देत नाही. विकासाकरिता आमदार क्षेत्र विकास निधीतून निधी मिळणे तर दूरच. साधे पत्राचे उत्तरही निवडून आलेले आमदार देत नाही ही शोकांतिका आहे. त्यामुळे संविधानाने निर्माण केलेल्या वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेत आमदाराचा उपयोग नगर पालिका, जिल्हा परिषदांना होत नाही. नप, जिपच्या अनेक अडचणी विकासाचे मुद्दे हे निवडून आलेले आमदार सभागृहात मांडत नाही. कारण त्यांना ज्ञानच नसते. राजकीय पक्ष ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पूनर्वसन म्हणूनच या निवडणुकीकडे पाहते. एखाद्या श्रीमंताला, कंत्राटदाराला उमेदवारी बहाल करते. त्यामुळे निवडून येण्याकरीता प्रचंड घोडेबाजार होतो.
'swarajya sanstha' vidhan parishad nivadanuk मतदान करणार्यालाही माहिती असते की निवडून आलेला हा आमचे काही कामाचा नाही. जे साध्य होते ते मतदानापूर्वीच घ्या अशी त्याची भुमिका असते. शिक्षक, पदविधर, स्थानिक स्वराज्य संस्था आदिंचीही हीच स्थिती आहे. ह्या निवडणुकीचा संविधानाने निश्चीत केलेला उद्देशच बाहेरील उमेदवार दिल्याने साध्य होत नाही. राजकारणात नाराज झालेले, पडलेले आमदार व नातेवाईक आदींचे पूनर्वसन हीच या निवडणुकीची प्रक्रीया ठरली आहे. ही स्थिती पाहता सर्वच राजकीय पक्षांनी नगर पालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद सदस्यांची नावे प्रत्यक्ष मतदार यादीत आहे त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी झाडे यांनी विविध प्रमुख राजकीय पक्ष, शासनाकडे प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.