शिरपूर जैन,
farmers built a farm road येथील बर्याच शेतकर्यांची एकांबा रस्त्या लगत शेती आहे. मात्र रस्ता नसल्याने शेतकर्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाच्या योजनेतून पाणंद रस्ता दुरुस्त होऊ शकला नाही. शेतकर्यांनी तब्बल ३.५० लाख रुपये खर्चून स्वखर्चाने रस्ता केला. प्रत्येकच गावात शेतकर्यांची योग्य रस्त्या अभावी मोठी अवहेलना होत असल्याचे चित्र नेहमीच पहावयास मिळते. पेरणी, पिक काढणी यावेळेस तर शेतकर्यांना अधिकच त्रास होतो.
पाणंद रस्त्यासाठी मोठा गाजावाजा केला जातो. मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम होत असल्याची दिसत नाही. वर्षानुवर्ष शेतकर्यांना खराब रस्त्यामुळे होणारा त्रास आजही सहन करावा लागत आहे. असाच काहीसा प्रकार शिरपूर परिसरात सुद्धा पहावयास मिळतो. परिणामता त्रस्त शेतकर्यांनी एक बैठक घेऊन स्वखर्चातून रस्त्याची दुरुस्ती करण्याचे ठरविले. त्यानुसार एकांबा रस्ता लगतच्या मुंजा पासून ते शेषराव खत्री यांच्या शेतापर्यंत दीड किलोमीटरचा रस्ता परिसरातील शेतकर्यांनी ढबर, मुरूम टाकून दुरुस्त केला. यासाठी त्यांनी एकरी शेतीचा नियम ठेवून त्यानुसार ३.५० लाख रुपये जमा केले. त्यातून या रस्त्याचे काम पूर्ण केले. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामासाठी ग्रामपंचायत मध्ये एक ठराव सुद्धा घेण्यात येऊन स्थानिक लोकप्रतिनिधींकडे देण्यात आला होता. तरीसुद्धा हे काम होऊ शकले नाही. अखेर शेतकर्यांनी एकत्रित होऊन स्वखर्चाने हा रस्ता दुरुस्त केला.