१५ लाखांची सुपारी, १० वर्षांचा वाद आणि हत्येचा कट उघड

काँग्रेसचे दोन नेते निलंबित

    दिनांक :30-May-2026
Total Views |
हैदराबाद,
advocate khwaja moizuddin हैदराबादमध्ये वक्फ बोर्डाचे पॅनेल वकील ख्वाजा मोईझुद्दीन यांच्या खून प्रकरणाने मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात राजकीय आणि कायदेशीर वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तेलंगणा काँग्रेसने या घटनेनंतर तातडीची कारवाई करत ज्येष्ठ नेते मेहबूब आलम आणि त्यांचा मुलगा मुजाहिद आलम खान यांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाच्या शिस्तपालन समितीने केलेल्या या निर्णयानंतर हे प्रकरण अधिकच गंभीर वळणावर गेले आहे.
 
 
 
 वकील ख्वाजा मोईझुद्दीन खून प्रकरण
 
 
 
पोलिस तपासात हा प्रकार केवळ अपघात नसून, आधीच आखलेला कट असल्याचे समोर आले आहे. हैदराबाद पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांच्या माहितीनुसार, ख्वाजा मोईझुद्दीन यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली होती. २३ मे रोजी पहाटे सुमारे सव्वापाचच्या सुमारास मोईझुद्दीन हे नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी घराबाहेर पडले असताना, नंबर प्लेट नसलेल्या स्कॉर्पिओने त्यांना जोरदार धडक दिली आणि आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना आधी महावीर रुग्णालयात आणि नंतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणामागे गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला वक्फ मालमत्तांवरील वाद असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मलकपेट आणि लकडी का पुल परिसरातील वक्फ संपत्तीच्या प्रशासन आणि आर्थिक नियंत्रणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये दीर्घकाळ संघर्ष सुरू होता. अनेक दिवाणी, फौजदारी तसेच वक्फ न्यायाधिकरणातील खटले प्रलंबित असताना, कायदेशीर लढाईत वारंवार पराभव होत असल्याच्या रागातूनच हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे.
तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, या हत्येसाठी सुमारे १५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. यासाठी सुरुवातीला महिनोंमहिने पाळत ठेवण्यात आली आणि वकिलाच्या दैनंदिन हालचालींची माहिती गोळा करण्यात आली.advocate khwaja moizuddin जानेवारी २०२६ पासून आरोपींचे नेटवर्क सक्रिय असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. या कटात जुने वाहन वापरण्यात आले असून, ते लपवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण योजनेत थेट संपर्क टाळण्यासाठी मध्यस्थांचा वापर करण्यात आला. मुजाहिद आलम खानने आपल्या साथीदारांच्या माध्यमातून किशन उर्फ पप्पूशी संपर्क साधून हल्ल्याची योजना आखल्याचा आरोप आहे. पुढे या टोळीने आणखी काही जणांना सामील करून प्रत्यक्ष कारवाई केली.
या प्रकरणात पहिली मोठी अटक हरियाणातील पानिपतमध्ये किशन उर्फ पप्पूची झाली. चौकशीत त्याने संपूर्ण कटाची माहिती उघड केल्यानंतर पोलिसांनी सूत्रांपर्यंत पोहोचत कारवाईला वेग दिला. त्यानंतर ज्युबिली हिल्स येथून मुजाहिद आलम खानला अटक करण्यात आली, तर मेहबूब आलम यांच्यासह इतर आरोपींनाही विविध ठिकाणांहून पकडण्यात आले. एकूण सात जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून काही जण अजूनही फरार आहेत.
तपासादरम्यान पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले वाहन, रोख रक्कम आणि अनेक मोबाईल फोन जप्त केले आहेत. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या कटात आणखी काही लोक सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सर्व आरोपींवर खून आणि गुन्हेगारी कट रचल्याचे गंभीर आरोप दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, काँग्रेस पक्षाने या प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत दोन्ही नेत्यांना तातडीने निलंबित केले आहे. पोलिसांनी पुढील तपास अधिक वेगाने सुरू ठेवला असून, उर्वरित फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.