नवी दिल्ली,
Gujarat Titans suffer shock आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यापूर्वी गुजरात टायटन्स संघाच्या तयारीला मोठा फटका बसला आहे. खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे संघाच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला असून अहमदाबादमध्ये त्यांचे आगमन उशिरा झाले आहे. त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाला फायनलपूर्वी फारच कमी वेळ मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे चंदीगड विमानतळावरील उड्डाणे प्रभावित झाली. याच कारणामुळे गुजरात टायटन्सचे चार्टर्ड विमान वेळेवर उड्डाण करू शकले नाही. क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवल्यानंतर संघ लगेच अहमदाबादकडे रवाना होणार होता, मात्र हवामानामुळे योजना विस्कळीत झाली.

शेवटी संघ शनिवारी रात्री उशिरा अहमदाबादमध्ये पोहोचला आणि त्यानंतर गांधीनगरमधील हॉटेलमध्ये दाखल झाला. यामुळे खेळाडूंना अंतिम सामन्यापूर्वी विश्रांती आणि तयारीसाठी २४ तासांपेक्षा कमी वेळ मिळाला आहे.दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाला तुलनेने अधिक वेळ मिळाला असून त्यांनी आधीच अहमदाबादमध्ये दाखल होऊन दोन सराव सत्रे पूर्ण केली आहेत. त्यामुळे फायनलपूर्वीच्या तयारीच्या दृष्टीने आरसीबीला थोडा फायदा झाल्याचे मानले जात आहे. गुजरात टायटन्स हा त्यांचा तिसरा आयपीएल अंतिम सामना खेळणार असून २०२२ मधील विजेतेपदाची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मात्र प्रवासातील अडथळ्यांमुळे निर्माण झालेल्या मर्यादित तयारीच्या वेळेमुळे संघासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.