नवी दिल्ली,
BJP in Mamata's stronghold पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीमधून समोर येणाऱ्या घडामोडींनी राजकीय चित्र वेगाने बदलताना दिसत आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेच्या उंबरठ्यावर असल्याचे संकेत मिळत असून, या पार्श्वभूमीवर पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाने विजयाच्या जल्लोषासाठी तयारी सुरू केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी साडेसहा वाजता मुख्यालयात येऊन कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
मतमोजणीतील सुरुवातीच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपने स्पष्ट आघाडी घेतली आहे, तर तृणमूल काँग्रेस मागे पडताना दिसत आहे. या कलांमुळे राज्याच्या सत्तासमीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सीमावर्ती भाग, आदिवासी पट्टे तसेच औद्योगिक क्षेत्रांमध्ये भाजपची पकड मजबूत होताना दिसत आहे, तर तृणमूल काँग्रेसने काही शहरी आणि पारंपरिक गडांमध्ये आपले अस्तित्व कायम ठेवले आहे.
ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक सलग सत्ता टिकवण्याची मोठी कसोटी मानली जात आहे. दुसरीकडे, भाजपने आक्रमक प्रचार करत निर्णायक विजयाकडे वाटचाल केल्याचे चित्र आहे. भवानीपूर मतदारसंघात प्रतिष्ठेची चुरस पाहायला मिळत असून, सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या ममता बॅनर्जी यांनी नंतर आघाडी घेतल्याचे दिसून आले आहे. एकूणच, मतमोजणी पुढे सरकत असताना राज्यातील अंतिम निकाल काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.