बंगाल-आसाममध्ये काँग्रेस शून्यचं!

    दिनांक :04-May-2026
Total Views |
चेन्नई,
Congress is zero in Bengal and Assam पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीतील सुरुवातीच्या कलांमधून काँग्रेस पक्षासाठी संमिश्र पण बहुतांश ठिकाणी चिंताजनक चित्र समोर आले आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पक्षाची कामगिरी अत्यंत कमकुवत दिसत असून, या राज्यांमध्ये प्रभावी उपस्थिती निर्माण करण्यात काँग्रेसला अपयश आल्याचे स्पष्ट होत आहे. याउलट केरळमध्ये मात्र पक्षाला मोठा दिलासा मिळताना दिसत असून, तिथे सत्तांतराची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची अवस्था सर्वात कठीण मानली जात आहे. मतमोजणीतील कलांनुसार पक्षाला फारशी आघाडी मिळताना दिसत नाही आणि मुख्य लढत भारतीय जनता पक्ष व तृणमूल काँग्रेस यांच्यातच केंद्रित झाली आहे. संघटनात्मक कमकुवतपणा आणि स्थानिक नेतृत्वाचा अभाव याचा मोठा फटका बसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
 
 
Congress is zero
 
आसाममध्येही काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेले नाही. सत्ताधारी आघाडी पुन्हा मजबूत स्थितीत दिसत असून काँग्रेस मागे पडताना दिसत आहे. त्यामुळे या राज्यातही पक्षाची पकड सैल झाल्याचे चित्र आहे. तामिळनाडूमध्ये मात्र परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. पारंपरिक द्रविड पक्षांच्या लढतीत अभिनेते थलपती विजय यांच्या नव्या राजकीय पक्षाने मोठी मुसंडी मारत शंभरहून अधिक जागांवर आघाडी घेतल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलताना दिसत आहेत. पुदुचेरीमध्येही चुरशीची लढत सुरू असून काँग्रेस तिसऱ्या स्थानावर असल्याचे कल दर्शवतात.
 
याउलट केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने मोठी आघाडी घेत सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. डाव्या आघाडीच्या दीर्घकालीन वर्चस्वाला धक्का देत केरळमध्ये बदलाची लाट दिसत आहे. तिरुवनंतपुरमसह राज्यातील विविध भागांत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच, केरळ वगळता इतर प्रमुख राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती कमजोर असल्याचे स्पष्ट होत असून, देशाच्या राजकीय नकाशावर पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.