तभा वृत्तसेवा
आर्णी,
arni-accident : बुधवार, मे रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास नागपूरहून दिग्रसला जाणारी एसटी बस आर्णी जवळील सातारा फाट्यावर ट्रकला जाऊन भिडली. या अपघातात बसमधील 14 प्रवासी आणि चालक, वाहकासह 16 जण जखमी झाले. त्यापैकी 6 गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारांसाठी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस वाहक ओंकार पुसांडे यांनी आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळी दिग्रस डेपोची बस नागपूरहून दिग्रससाठी निघाली. आर्णीपासून 5 किमी अंतरावर असलेल्या सातारा फाट्यावर बसचालक किशोर बुटले यांनी आडव्या आलेल्या ट्रकला वाचविण्यासाठी ब्रेक लावले, परंतु बस ट्रकला जाऊन भिडली. हा ट्रक येथील महालक्ष्मी जिनिंगच्या गोदामातून सरकी भरून वजनकाट्याकडे जात असताना त्याला धडक बसली. ही बस यवतमाळहून निघाली होती आणि त्यात एकूण 18 प्रवासी होते.
या अपघातात बस चालक किशोर पांडुरंग बुटले यांच्या छाती, पाय व हाताला आणि वाहक ओंकार पुसांडे यांच्या हात, पाय व छातीला दुखापत झाली आहे. अशरफ लतीफ (यवतमाळ), शारदा विजय सिंगदकर (दिग्रस), इब्राहिम शहा (आर्णी), असमा काझी (राळेगाव) यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
इतर जखमींमध्ये प्रवीण समतपुरे (यवतमाळ), अमन राठोड (पुसद), आसिया सुलताना (वाशीम), प्रभा कोरवते (मेहकर), कांचन चव्हाण (नागपूर), अर्चना खोडके (यवतमाळ), रेणुकादास जोशी (यवतमाळ), रोहन कोंडबवार (कोटंबा), अर्चना कोंडबवार (कोटंबा) व आदर्श कोंडबवार (कोटंबा) हे किरकोळ जखमी आहेत.
ट्रकचालक संजयप्रसाद वर्मा (47, डोबी, जि. गया, बिहार) याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात आर्णी पोलिस पुढील तपास करीत आहेत.