इस्लामाबाद,
Pakistan's threat to India भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सिंधू नदीच्या पाण्यावरून वाद चिघळताना दिसत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी भारताला इशारा देत म्हटले आहे की, करारानुसार पाकिस्तानच्या वाट्याला येणारे पाणी अडवण्याचा किंवा त्याचा मार्ग बदलण्याचा कोणताही प्रयत्न झाला, तर तो युद्धासारखा गंभीर प्रकार मानला जाईल. अशा कोणत्याही पावलाला पाकिस्तान पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानमध्ये अलीकडेच काही कार्यक्रमांचे आयोजन करून भारताविरोधात तीव्र भूमिका मांडण्यात आली. या कार्यक्रमांदरम्यान पाकिस्तानातील अनेक नेत्यांनी भारतावर आरोपांची सरबत्ती केली. परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्यासह इतर वरिष्ठ नेत्यांनीही आपली भूमिका ठामपणे मांडत, देशाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
राजनैतिक अधिकाऱ्यांसमोर बोलताना दार यांनी असेही नमूद केले की, या प्रदेशातील परिस्थिती मागील काही घटनांमुळे अधिकच तणावपूर्ण बनली आहे. त्यांनी भारतावर हेतुपुरस्सर आरोप करत, परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले. तसेच, नद्यांच्या प्रवाहातील बदलांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि करारातील जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडल्या जात नसल्याचा आरोप केला.पाकिस्तानने नेहमीच प्रादेशिक शांततेसाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा करत, आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपला सहभाग अधोरेखित केला. मात्र, सिंधू नदीच्या पाण्यावरून वाढलेला हा वाद दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढवण्याची शक्यता निर्माण करत आहे.