नवी दिल्ली,
केंद्र सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत २०२६-२७ हंगामासाठी उसाच्या हमी दरात वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना थेट आर्थिक फायदा होणार आहे. नव्या निर्णयानुसार उसाचा हमी दर ३६५ रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. मागील हंगामाच्या तुलनेत हा दर अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. एका टन उसाला आता अधिक रक्कम मिळणार असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
साखर उद्योगालाही स्थिरता मिळणार
उसाच्या दर्जानुसार आणि साखर उताऱ्याच्या प्रमाणानुसार दरात बदल होणार आहे. ज्या उसातून अधिक साखर मिळते, त्या शेतकऱ्यांना अतिरिक्त प्रोत्साहन दिले जाणार आहे. तर कमी उताऱ्याच्या उसासाठी ठराविक समायोजनाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, ठराविक मर्यादेपेक्षा कमी उतारा असल्यास शेतकऱ्यांना किमान हमी दर मिळेल याचीही हमी देण्यात आली आहे.सरकारच्या मते, उसाच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चाच्या तुलनेत हा नवा दर अधिक लाभदायक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा जास्त परतावा मिळणार आहे. या निर्णयामुळे साखर उद्योगालाही स्थिरता मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, कापूस आणि इतर पिकांसाठीही उत्पादन वाढ आणि शेतकरी हित लक्षात घेऊन विविध योजना आणि निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात उत्पादन वाढ, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ आणि बाजारपेठेतील स्थैर्य साधण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आगामी हंगामात उत्पादन वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.