कानपूर,
Fatal accident in Kanpur कानपूर येथे प्रवाशांनी भरलेली खासगी बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन कालव्यात कोसळल्याने मोठी खळबळ उडाली. ही घटना बिधानू परिसरातील रामगंगा कालवा पुलाजवळ घडली. बसमध्ये एकूण १९ जण प्रवास करत होते. अपघातानंतर परिसरात आरडाओरडा आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बस एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन कुधनीहून राणीयाकडे जात होती. प्रवासादरम्यान बसने आधी एका डंपरला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसने पुलावरील कठडे तोडत थेट कालव्यात झेप घेतली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथक आणि गोताखोर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्यामध्ये मोठी भूमिका बजावली. बसच्या काचा फोडून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की बसचा पुढील भाग पूर्णपणे नुकसानग्रस्त झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, बसचा वेग अधिक असल्यामुळे आणि चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.