उन्हाने भाजलेल्या महाराष्ट्रावर पडणार पावसाची सर!

    दिनांक :07-May-2026
Total Views |
मुंबई,
Heavy rains to fall on Maharashtra भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील अनेक भागांसाठी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला असून काही जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशाराही जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात तीव्र उष्णतेची लाट कायम असताना आता हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Maharashtra 
 
 
 
मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि परिसरात उष्ण व दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कडक उन्हासह वाढलेल्या उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आता पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचे सांगितले जात आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड या भागांतही वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेतमाल, जनावरे आणि घराबाहेरील वस्तू सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
 
दरम्यान, राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा बेचाळीस अंशांच्या पुढे गेला आहे. वर्धा, अमरावती, गडचिरोली, अकोला, वाशीम, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे तीव्र उष्णतेची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांनंतर पुन्हा कोरडे हवामान परतण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज लक्षात घेऊन नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.