नवी दिल्ली,
Suryakumar will be given the captaincy भारतीय टी-२० संघाच्या नेतृत्वात मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादव यांच्या कर्णधारपदाबाबत निवड समिती गंभीरपणे विचार करत असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. अलीकडेच त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वविजेतेपद पटकावले असले, तरी त्यांच्या वैयक्तिक फलंदाजीतील सातत्याने होत असलेल्या अपयशामुळे संघ व्यवस्थापन चिंतेत असल्याचे समजते. त्यामुळे आगामी मालिकांपासून भारतीय संघ नव्या कर्णधारासह मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विश्वचषकातील यशानंतरही सूर्यकुमार यांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्पर्धेदरम्यान त्यांनी काही उपयुक्त खेळी केल्या, मात्र अपेक्षेप्रमाणे मोठ्या धावा करण्यात त्यांना सातत्य राखता आले नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक सामने जिंकले असले, तरी फलंदाज म्हणून त्यांची घसरलेली कामगिरी आणि वाढते वय यामुळे पुढील चार वर्षांच्या नियोजनात बदल आवश्यक असल्याचे मत निवड समितीमध्ये व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर श्रेयस अय्यर यांचे नाव पुढील कर्णधार म्हणून आघाडीवर आले आहे. गेल्या काही काळात ते टी-२० संघाबाहेर असले, तरी नेतृत्वक्षम खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकांसाठी संघ निवडताना अय्यर यांच्या नावावर अंतिम निर्णय होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघ आता २०२८ च्या टी-२० विश्वचषकासह लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या तयारीलाही सुरुवात करत असल्याने दीर्घकालीन दृष्टीकोनातून नवीन नेतृत्व उभे करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादव यांचे भवितव्यही चर्चेचा विषय ठरत आहे. ते आधीच कसोटी आणि एकदिवसीय संघाचा भाग नसल्याने, टी-२० संघातूनही त्यांना वगळण्यात आले तर भारतीय संघातील त्यांचा प्रवास थांबू शकतो. त्यामुळे आगामी संघनिवड आणि कर्णधारपदाचा निर्णय भारतीय क्रिकेटमध्ये मोठे बदल घडवणारा ठरण्याची शक्यता आहे.