नागपूर,
Hilyabais birth anniversary सामाजिक समरसता मंच, त्रिमूर्ती भाग तथा भाऊसाहेब सुर्वे नगर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती रविवारी सुर्वे नगर ज्येष्ठ नागरिक मंडळ सभागृहात उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या स्मिता बोकारे यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी अहिल्याबाईंच्या पराक्रम, लोककल्याणकारी कार्य, महिला सक्षमीकरण, उद्योगविकास तसेच रस्ते, घाट आणि मंदिरांच्या निर्मितीसाठी केलेल्या योगदानाची उदाहरणांसह माहिती दिली.

यावेळी प्रा. डॉ. सुधाकर इंगळे यांनी मार्गदर्शन करताना समरसतेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, समरसता म्हणजे केवळ समानता नव्हे, तर परस्पर सन्मान, बंधुभाव आणि सहकार्याची भावना होय. अहिल्याबाई होळकर यांनी समाजातील दुर्बल, गरीब, महिला आणि वंचित घटकांना आधार देत समाज एकसंघ करण्याचे कार्य केले. त्यामुळे त्या आजही आदर्श समाजकारण आणि सुशासनाचे प्रेरणास्थान आहेत. Hilyabais birth anniversary त्यांच्या जीवनातून सेवा, न्याय आणि समरसता ही मूल्ये आत्मसात करण्याची प्रेरणा मिळते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. सुषमा पनकुळे यांनी समरसता हे एक महत्त्वपूर्ण जीवनमूल्य असल्याचे सांगितले. समाजात समरसतेचा विचार, भाव आणि कृती रुजविण्याच्या उद्देशाने सामाजिक समरसता गतिविधीची स्थापना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या वर्षाताई भोयर यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रिय आणि लोकाभिमुख राज्यकारभाराचा उल्लेख केला. Hilyabais birth anniversary जात, पंथ, धर्म किंवा आर्थिक स्थिती यावर आधारित कोणताही भेदभाव न करता त्यांनी प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले, असे त्यांनी नमूद केले. यावेळी काही महिलांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची वेशभूषा साकारून त्यांच्या कार्याला अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिपाली काशेट्टीवार यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील महिला व नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
सौजन्य: अर्चना सोनकुसरे, संपर्क मित्र