वाशीम,
washim news कामानिमित्त मित्रांसोबत वाशीम येथे आलेल्या ३४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवार, १० जून पहाटे उघडकीस आली. आशिष बाबाराव शेळके (रा. एकलारा, ता. आर्वी, जि. वर्धा) असे मृतकाचे नाव आहे. घातपात की अपघात, यावरून तर्कवितर्क लावले जात असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार, आशिष शेळके हा त्याचा मित्र विनोद वसंतराव फटिंग (रा. सेलू, जि. वर्धा), अजय मनोहर वानखेडे (रा. धानोली, जि. वर्धा), गणेश जनार्दन भगत (रा. धानोली, जि. वर्धा) आणि सचिन शंकर राऊत (रा. सेलू, जि. वर्धा) यांच्यासह वाशीम शहरातील एका ले-आऊटच्या कामासाठी आले होते. दिवसभराचे काम आटोपल्यानंतर, हे पाचही जण ९ जून रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास शहरातील शिवाजी चौक परिसरातील ‘हॉटेल अलख लॉजिंग’मध्ये मुक्कामी आले होते. त्यांनी हॉटेलमधील कॉमन डॉर्मेट्रीमध्ये मुक्काम केला.washim news मात्र, बुधवारी पहाटे जेव्हा अन्य मित्रांना जाग आली, तेव्हा आशिष बेडवर दिसून आला नाही. त्याचा शोध घेतला असता, हॉटेलला लागून असलेल्या इमारतीच्या परिसरात तो मृतावस्थेत आढळून आला. वाशीम शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पुढील तपास वाशीम शहर पोलिस करत आहेत.