नवी दिल्ली,
Indians missing in Oman अरब समुद्रातील ओमान किनाऱ्याजवळ एका तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि अमेरिकेदरम्यान राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. या घटनेत जहाजावरील तीन भारतीय खलाशी बेपत्ता झाल्याने भारताने तीव्र चिंता व्यक्त केली असून, अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या घटनेनंतर अमेरिकेनेही प्रतिक्रिया देत भारत सरकारशी सातत्याने संपर्क ठेवला असल्याचे सांगितले. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांवर दोन्ही देशांमध्ये संवाद सुरू असल्याचे अमेरिकन परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले आहे.

हल्ल्याचे लक्ष्य ठरलेल्या तेलवाहू जहाजावर एकूण २८ कर्मचारी होते. त्यापैकी २४ जण भारतीय नागरिक होते. बचाव मोहिमेदरम्यान २१ भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी तीन भारतीयांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.घटनेनंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय खलाशांच्या जीविताला धोका निर्माण करणारी कोणतीही कारवाई अस्वीकार्य असल्याचा स्पष्ट संदेश दिला. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासन आणि नौदलाच्या संपर्कात असून शोधमोहीम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज चीनमधून संयुक्त अरब अमिरातीकडे जात असताना त्याच्या इंजिन विभागात भीषण आग लागली. जहाजाने आपत्कालीन संदेश पाठवल्यानंतर ओमानच्या नौदलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. आगीमागे क्षेपणास्त्र हल्ला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, याबाबत विविध आंतरराष्ट्रीय यंत्रणा तपास करत आहेत. दरम्यान, पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे व्यापारी जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भारताने या संपूर्ण घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहत तणाव कमी करण्याचे आणि आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे. तीन भारतीय खलाशांचा अद्याप शोध सुरू असल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.