काँक्रीटच्या जंगलात हरवली हिरवाई

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
- वास्तवात बनतेय शहर उष्णतेचे केंद्र
 
- विधी शर्मा
नागपूर, 
Tree felling नागपूरने यंदा विक्रमी ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाचा तडाखा सहन केला. या पार्श्वभूमीवर शहरातील वाढत्या वृक्षतोडीबरोबरच भरपाई म्हणून केल्या जाणाऱ्या वृक्षलागवडीच्या धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. माहिती अधिकारातून (आरटीआय) समोर आलेल्या माहितीनुसार, शहरातील दाट लोकवस्तीच्या भागांत तोडलेल्या झाडांच्या बदल्यात अनेकदा १० ते १५ किलोमीटर दूर वृक्षलागवड केली जात असल्याचे दिसून आले आहे.
 
ngp
 
पर्यावरण कार्यकर्ते सचिन खोब्रागडे यांनी मिळविलेल्या कागदपत्रांनुसार, विविध विकास प्रकल्पांसाठी शहरातील झाडे तोडण्यात आली, मात्र त्यांची भरपाई मूळ परिसरात न करता दूरच्या भागांमध्ये करण्यात आली. त्यामुळे ज्या भागांत झाडांची सर्वाधिक गरज आहे, तेच भाग हिरवाईपासून वंचित राहत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
मॉडेल मिल-तुळशीबाग मार्गावरील रस्ते विकासासाठी तोडलेल्या १८ झाडांच्या बदल्यात मध्यवर्ती कारागृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तर अजनी रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्पासाठी तोडलेल्या १६० झाडांच्या बदल्यात ओल्ड कामठी रोडवर सुमारे ६ हजार रोपे लावल्याचा दावा करण्यात आला. हे ठिकाण प्रकल्प क्षेत्रापासून सुमारे १५ किलोमीटर दूर आहे.
याचप्रमाणे, त्रिमूर्ती नगर परिसरातील वृक्षतोडीची भरपाई गोरेवाडा येथे, तर नागपूर मेट्रोने शहरातील विविध भागांत तोडलेल्या झाडांच्या बदल्यात अंबाझरीजवळील ‘लिटल वुड्स’ परिसरात वृक्षलागवड केली. विशेष म्हणजे ही ठिकाणे आधीच हिरवाईने समृद्ध आहेत.
Tree felling  पर्यावरण कार्यकर्त्या अनसूया काळे यांच्या मते, दशकानुदशके सावली देणारे प्रगल्भ वृक्ष हटवून त्यांच्या बदल्यात दूरवर रोपे लावणे हा पर्यावरणीय तोटा भरून काढण्याचा मार्ग ठरू शकत नाही. यामुळे नागरिकांना मिळणारी सावली, थंडावा आणि उष्णतेपासूनचे संरक्षण कमी होत आहे.
दरम्यान, नीरीच्या अभ्यासानुसार नागपूरमधील वृक्ष आच्छादन केवळ १९.५४ टक्के असून, कायद्यानुसार अपेक्षित ३३ टक्क्यांपेक्षा ते खूपच कमी आहे. धरमपेठ वगळता अनेक भागांत हरित आच्छादनाची मोठी कमतरता असल्याचेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.


पर्यायी वृक्षलागवड हा अनेकदा केवळ आकड्यांचा खेळ ठरतो. एका प्रौढ झाडामुळे मिळणाऱ्या पर्यावरणीय सेवांची भरपाई अनेक रोपे लावूनही होत नाही. शहरात जागेअभावी वृक्षलागवड प्रभावी ठरत नसल्याने उभ्या झाडांचे संरक्षण करणे हाच पर्यावरण संवर्धनाचा सर्वात परिणामकारक मार्ग आहे
- प्राची माहूरकर
पर्यावरणविषयक अभ्यासक व सल्लागार