पुणे
Rohit Pawar राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली असली तरी या योजनेतील एका अटीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असल्यास अतिरिक्त रक्कम एकरकमी भरण्याची अट घालण्यात आल्याने विरोधकांकडून तीव्र टीका होत आहे.
या अटीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी जोरदार विरोध दर्शवला असून, ही कर्जमाफी नसून शेतकऱ्यांकडून वसुली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारने ही अट तातडीने रद्द करून सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची पूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.या मागणीसाठी रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून, आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखर कमी झाली आहे. वैद्यकीय पथकाकडून सलाईन लावण्याची तयारी करण्यात आली असली तरी त्यांनी सलाईन घेण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या Rohit Pawar पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याशी संपर्क साधला असून ते दोन तासांत आंदोलनस्थळी येणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर काही ठोस आश्वासन मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र तोपर्यंत ओआरएस किंवा सलाईन घेणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी कायम ठेवली आहे.या आंदोलनस्थळी रोहित पवार यांचे कुटुंबीयही उपस्थित आहेत. त्यांच्या पत्नी कुंती पवार, आई सुनंदा पवार आणि मुलगा यांची उपस्थिती असून कुटुंबीय भावनिक झालेले दिसून आले. आंदोलनामुळे परिसरात तणावाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.सरकारच्या कर्जमाफी धोरणावरून सुरू झालेला हा वाद आता अधिक तीव्र होत असून, पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.