आसाम
AN-32 aircraft crash भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा शनिवारी सकाळी आसाममधील जोरहाट हवाई तळावर उतरत असताना भीषण अपघात झाला. विमान धावपट्टीवर उतरण्याच्या प्रक्रियेत असतानाच ते अचानक कोसळले. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की विमानाचे दोन तुकडे झाले असून परिसरात धूर आणि आगीचे लोट दूरपर्यंत दिसत होते. दुर्घटनेनंतर मोठा स्फोटसदृश आवाजही झाला. या अपघातात फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार यांच्यासह भारतीय वायुदलाचे सहा जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर हवाई दलाच्या बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव आणि मदतकार्य सुरू केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष यंत्रणा तैनात करण्यात आली. अपघातानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, AN-32 हे मालवाहू विमान नियमित मोहिमेवर होते. जोरहाट हवाई तळावर उतरत असताना विमानाला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सविस्तर चौकशी अहवालानंतरच याबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे.
या दुर्घटनेत शहीद झालेले फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार हे बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील बनवारिया गावचे रहिवासी होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच गावावर शोककळा पसरली. कुटुंबीयांसह संपूर्ण गावाने आपल्या सुपुत्राला अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.विशेष म्हणजे, आसामकडे रवाना होण्यापूर्वी शुभम कुमार यांच्याशी त्यांच्या आईचा व्हिडिओ कॉलवर संवाद झाला होता. त्या वेळी त्यांनी, “मी सध्या थोडा व्यस्त आहे. आरामात पोहोचल्यानंतर तुम्हाला पुन्हा फोन करतो,” असे सांगून संभाषण संपवले होते. मात्र, तोच त्यांचा कुटुंबीयांशी झालेला शेवटचा संवाद ठरला.शुभम कुमार यांनी 2021 मध्ये भारतीय वायुदलात अधिकारी म्हणून प्रवेश केला होता. देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या शुभम यांनी वैयक्तिक आयुष्यापेक्षा कर्तव्याला महत्त्व देत लग्नालाही नकार दिला होता, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान, भारतीय हवाई दलाने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू असून चौकशी अहवालानंतरच दुर्घटनेमागील वास्तविक कारण स्पष्ट होणार आहे.