तेहरान,
irans nuclear stockpile vanishes अमेरिका आणि इराण यांच्यातील अणु-विषयक तणाव नव्या टप्प्यावर पोहोचला असून इराणने आपला अत्यंत संवेदनशील समृद्ध युरेनियमचा साठा अधिक सुरक्षित करण्यासाठी मोठी हालचाल केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकी गुप्तचर सूत्रांच्या दाव्यानुसार, इराणने सुमारे ५०० किलो उच्च-समृद्ध युरेनियम भूमिगत बोगद्यांमध्ये साठवून त्यांचे प्रवेशमार्गच उद्ध्वस्त केले आहेत. एवढेच नव्हे तर या परिसरात भूसुरुंगही पेरण्यात आल्याने हा साठा बाहेर काढणे अत्यंत कठीण बनले आहे.

अमेरिकेकडून संभाव्य लष्करी कारवाई किंवा युरेनियम जप्त करण्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर इराणने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी इराणच्या अणुस्थळांवर कारवाई करून संवर्धित युरेनियम ताब्यात घेण्याचे संकेत दिले होते. यानंतर तेहरानने आपल्या अणु-संपत्तीचे संरक्षण अधिक मजबूत केल्याची चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडींमुळे दोन्ही देशांमधील अणु-वाटाघाटींवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिकेच्या प्रस्तावित आराखड्यानुसार, इराणने आपला संवर्धित युरेनियम साठा आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली सुपूर्द करायचा होता. मात्र आता बोगद्यांचे मार्ग बंद करण्यात आल्याने आणि परिसर धोकादायक बनल्याने ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अणु-सुरक्षा क्षेत्रातील जाणकारांच्या मते, इराणची ही रणनीती केवळ सुरक्षेपुरती मर्यादित नसून ती एक राजनैतिक डावपेचही असू शकते. भविष्यातील कोणत्याही तपासणीदरम्यान किंवा कराराच्या अंमलबजावणीत काही युरेनियमपर्यंत पोहोचणे अशक्य असल्याचा दावा करून इराणला आंतरराष्ट्रीय दबावातून काही प्रमाणात सुटका मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गुप्तचर अहवालांनुसार, हा युरेनियम प्रामुख्याने इस्फहान अणु-संकुलाजवळील भूमिगत बोगद्यांमध्ये ठेवण्यात आल्याचा अंदाज आहे. अमेरिकेने यापूर्वी हा साठा ताब्यात घेण्यासाठी विशेष तांत्रिक आणि लष्करी मोहीमेची तयारी केली होती. मात्र जोखीम आणि संभाव्य परिणाम लक्षात घेऊन ती मोहीम पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जाते.
विशेष म्हणजे, हा साठा सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्खनन यंत्रणा आणि स्फोटक निकामी करणाऱ्या पथकांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही करार झाला तरी युरेनियम प्रत्यक्षात बाहेर काढणे आणि त्याची विल्हेवाट लावणे हे सर्वांत मोठे आव्हान ठरणार असल्याचे अणु-तज्ज्ञांचे मत आहे.