मुंबई,
Optimism in the stock market अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी दमदार वाढ नोंदवली. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स ७३६.३८ अंकांच्या वाढीसह ७६,२६४.३३ वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ५० निर्देशांक २३१ अंकांनी वधारून २३,८५३.९० या पातळीवर स्थिरावला.व्यवहारादरम्यान बाजाराने आणखी उंच भरारी घेतली होती. एका टप्प्यावर सेन्सेक्स ७६,८२१.०७ आणि निफ्टी २४,०११.४० या उच्चांकांपर्यंत पोहोचला होता. मात्र शेवटच्या सत्रात काही प्रमाणात नफा-वसुली झाल्याने निर्देशांकांनी सुरुवातीची काही वाढ गमावली.

सेन्सेक्समधील बहुतांश कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. विशेषतः ट्रेंटच्या शेअरने सर्वाधिक ५ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय इंडिगो, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक सिमेंट, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, एल अँड टी आणि बजाज फायनान्स यांच्या शेअर्समध्येही उल्लेखनीय वाढ झाली.आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांनीही बाजाराला आधार दिला. इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये सकारात्मक हालचाल दिसून आली.
दुसरीकडे काही निवडक शेअर्समध्ये घसरणही पाहायला मिळाली. एनटीपीसीचा शेअर सर्वाधिक घसरला. त्याशिवाय आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, अदानी पोर्ट्स, सन फार्मा, टेक महिंद्रा आणि टाटा स्टील यांचे शेअर्स किरकोळ तोट्यात बंद झाले.जागतिक स्तरावरील तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला असून त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. तज्ज्ञांच्या मते, जागतिक परिस्थिती स्थिर राहिल्यास आगामी सत्रांमध्येही बाजारातील सकारात्मक वातावरण कायम राहू शकते.