मुंबई
Child Poisoning Case मुंबईतील गिरगाव परिसरात एका दोन वर्षीय चिमुरडीला विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. घरातील तांदळाच्या साठवणुकीसाठी ठेवण्यात आलेल्या ‘ॲल्युमिनियम फॉस्फाइड’ या विषारी कीटकनाशकाच्या वायूमुळे ही विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या संबंधित मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ती प्रगत जीवनरक्षक प्रणालीच्या (अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट) साहाय्याने उपचार घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून या मुलीला उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होता. त्यातून गंभीर निर्जलीकरण झाल्याने तिची प्रकृती अधिक खालावली. उपचारादरम्यान तिला अवघ्या १५ तासांच्या कालावधीत तीन वेळा हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्यावर हाजी अली येथील एनएच एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेत मुलीच्या मोठ्या Child Poisoning Case बहिणीलाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला होता. मात्र, तिला योग्य उपचारानंतर आराम मिळाला असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.कुटुंबातील नातेवाईकांपैकी एका डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील तांदळाच्या डब्यात उंदीर आणि कीटकांपासून संरक्षणासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाइडच्या पुड्या ठेवण्यात आल्या होत्या. त्या पुड्या ठेवल्यानंतर घरात तीव्र वास पसरला होता. याच कालावधीत दोन्ही मुलींना त्रास सुरू झाल्याने विषारी वायूंच्या संपर्कामुळे विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना डॉ. तुषार पालवे यांनी ॲल्युमिनियम फॉस्फाइड हे अत्यंत घातक रसायन असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, या पदार्थाच्या संपर्कात आल्यास श्वास घेण्यास त्रास होणे, जुलाब, उलट्या आणि इतर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. अगदी कमी प्रमाणात शरीरात गेले तरी हे रसायन जीवघेणे ठरू शकते.डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या उपचार सुरू असलेल्या चिमुरडीच्या मूत्रपिंडांवरही परिणाम झाला असून तिला किडनी फेल्युअरचा सामना करावा लागत आहे. तिच्या मेंदूवर गंभीर परिणाम झाला नसल्यास ती या संकटातून सावरू शकते, अशी आशा वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तिला कृत्रिम Child Poisoning Case ऑक्सिजनच्या सहाय्याने उपचार दिले जात आहेत.तज्ज्ञांनी नागरिकांना घरामध्ये कीटकनाशके किंवा धोकादायक रसायने वापरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अशा पदार्थांपासून लहान मुलांना दूर ठेवणे, अन्नधान्य साठवताना सुरक्षित पद्धतींचा अवलंब करणे आणि तीव्र वास किंवा आरोग्याशी संबंधित लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत कलिंगड खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्या प्रकरणातही विषारी रसायनांच्या अंशांचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर घरगुती वापरातील रसायनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.