बुलढाणा,
distribution-of-zinc-tablets-and-ors : पाच वर्षांखालील बालकांमध्ये अतिसार (डायरिया) या आजारामुळे होणारे मृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ‘स्टॉप डायरिया अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार ६३३ बालकांना झिंकच्या गोळ्या आणि ओआरएस (जठड) द्रावणाचे वितरण करण्यात येणार आहे.
अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन मंगळवारी आयुष्यमान आरोग्य मंदिर, पाडळी येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव तथा जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल जवरे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात आरोग्य सेविकांनी ओआरएस द्रावण तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर करून अतिसारग्रस्त बालकांच्या उपचारामध्ये त्याचे महत्त्व अधोरेखित केले.
तसेच आशा स्वयंसेविकांनी योग्य हात धुण्याच्या पद्धतीचे प्रात्यक्षिक सादर करत स्वच्छतेच्या सवयी आणि रोगप्रतिबंधाचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील २ हजार ०८३ आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि विविध स्तरांवरील अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आशा स्वयंसेविकांमार्फत प्रत्येक पात्र बालकाच्या घरी भेट देऊन ओआरएस व झिंक गोळ्यांचे वितरण केले जाणार असून अतिसार प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, शासकीय आरोग्य संस्था तसेच अंगणवाडी केंद्रांचा या अभियानात सक्रिय सहभाग राहणार आहे.
पालकांना अतिसार झालेल्या बालकांना तात्काळ ओआरएस द्रावण देणे, डॉटरांच्या सल्ल्यानुसार झिंक गोळ्यांचा वापर करणे, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा वापर करणे आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी बोलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी अतिसार हा बालमृत्यूचे एक प्रमुख कारण असल्याचे सांगून, योग्य वेळी उपचार, ओआरएसचा वापर आणि स्वच्छतेच्या सवयी यांमुळे या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळविता येते, असे नमूद केले. नागरिकांनी स्वच्छता राखून सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा वापर करावा तसेच अतिसाराची लक्षणे दिसताच तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेश धुताडमल, डॉ. शैलेश खंडारे, डॉ. शिवानंद शिंगाडे, समुदाय आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक कर्मचारी, आरोग्य सहायिका, आशा स्वयंसेविका तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.