सोलापूर,
Reel star Rohini death case रोहिणी पराध्याच्या मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात तब्बल 25 दिवसांनंतर पोलिसांनी त्यांच्या पती निलेश पराध्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा परिसरातील रोहिणी पाराध्ये सोशल मीडियावर लोकप्रिय होत्या. त्यांच्या अचानक मृत्यूने अनेकांना धक्का बसला होता. सुरुवातीला वैयक्तिक तणाव आणि कौटुंबिक वाद यामुळे ही घटना घडल्याची चर्चा होती. मात्र तपास पुढे सरकत असताना आता अनेक नवे मुद्दे समोर येत आहेत.

रोहिणी यांच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, रोहिणी यांच्यावर दीर्घकाळ मानसिक आणि शारीरिक दबाव होता. तसेच त्यांच्या इच्छेविरुद्ध काही गोष्टी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी निलेश पाराध्ये यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीपासूनच विविध अंगांनी तपास सुरू ठेवला होता. कॉल रेकॉर्डसह इतर तांत्रिक पुरावेही तपासण्यात आले. सुरुवातीला ठोस धागेदोरे हाती लागत नसल्याने तपास गुंतागुंतीचा बनला होता. मात्र नव्या तक्रारीनंतर तपासाला वेग आला आहे.
दरम्यान, रोहिणी यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही काही माहिती समोर येत आहे. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात मागील काही महिन्यांपासून तणाव वाढल्याची चर्चा आहे. वाढते काम, व्यवसायाचा विस्तार आणि वैयक्तिक मतभेद यामुळे तणाव निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून, पोलिसांकडून सर्व बाजूंची कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी महत्त्वाच्या घडामोडी समोर येण्याची शक्यता आहे.