शेगाव रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियान

आमदार डॉ. संजय कुटे यांचा सहभाग

    दिनांक :19-Jun-2026
Total Views |
शेगाव,
Sanjay Kute शेगाव, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या सेवा, सुशासन आणि जनकल्याणाच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संतनगरी शेगाव येथे आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली शेगाव रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता अभियान व श्रमदान कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Shegaon railway station cleanliness drive, Sanjay Kute MLA 
या अभियानात आमदार डॉ. संजय कुटे यांनी स्वतः झाडू हातात घेत रेल्वे स्थानक परिसराची स्वच्छता केली. कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांसमवेत श्रमदान करत त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.यावेळी बोलताना आमदार डॉ. कुटे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानामुळे स्वच्छतेबाबत जनमानसात मोठी जागृती निर्माण झाली आहे. स्वच्छता ही केवळ एक दिवसाचा कार्यक्रम किंवा अभियान नसून ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास स्वच्छ, सुंदर आणि विकसित भारताचे स्वप्न अधिक वेगाने साकार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
 
संत गजानन महाराजांच्या पावन Sanjay Kute नगरीत दररोज हजारो भाविक येत असतात. त्यामुळे धार्मिक स्थळांचे पावित्र्य, शहराचे सौंदर्य आणि स्वच्छता कायम राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, प्रत्येकाने आपल्या परिसरात स्वच्छतेचा संकल्प करून इतरांनाही त्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन आमदार डॉ. कुटे यांनी केले.स्वच्छता अभियानादरम्यान रेल्वे स्थानक परिसरातील कचरा संकलित करण्यात आला तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरात स्वच्छतेचा सकारात्मक संदेश पोहोचला असून नागरिकांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
 
 
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीच्या निमित्ताने राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ औपचारिक न राहता जनसहभागातून समाजात स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. स्वच्छ, सुंदर आणि विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.