मुंबई
Omraje Nimbalkar शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात मोठी राजकीय खळबळ उडाली असून सहा खासदार पक्षातून फुटल्याच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या व्हिपला या खासदारांनी प्रतिसाद न दिल्याचे तसेच महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या घडामोडींमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव विशेष चर्चेत आले आहे. अनेक वर्षे ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिलेले ओमराजे निंबाळकर यांनी अलीकडेच पक्षातून दूर होत एकनाथ शिंदे यांचा मार्ग स्वीकारल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत असून काही समर्थकांनी त्यांना अनफॉलो करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, ओमराजे निंबाळकर Omraje Nimbalkar यांनी या संपूर्ण घडामोडींवर पहिली प्रतिक्रिया देताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “राजकीय अस्तित्वाचे संकट समोर होते, तसेच विकासनिधीचा अभाव यासारख्या अडचणी होत्या. मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे. भावनिकदृष्ट्या विचार केला तर हा निर्णय चुकीचा वाटतो, मात्र राजकीय दृष्टिकोनातून तो योग्य वाटतो,” असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, “माझ्याकडे निष्ठा होती, तर समोरच्या बाजूला सत्ता आहे. सत्ता आणि निधी नसल्यामुळे मतदारांची कामे पूर्ण करणे कठीण झाले होते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या किंवा वाय प्लस सुरक्षा मिळाल्याच्या चर्चांना त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावले असून हा निर्णय केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच आरोग्याच्या कारणांवरही त्यांनी भाष्य करत उद्धव ठाकरे यांच्या प्रवास क्षमतेबाबत आणि आदित्य ठाकरे यांच्या सक्रियतेबाबतही मत व्यक्त केले आहे.या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गटात अंतर्गत अस्वस्थता वाढल्याचे दिसत असून, पुढील काही दिवसांत या राजकीय समीकरणांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आमदार कैलास पाटील यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “प्रत्येक वर्षी वर्धापन दिनाला आम्ही एकत्र जात होतो, मात्र यंदा खासदार ओमराजे निंबाळकर माझ्यासोबत नाहीत हे माझ्यासाठी वेदनादायक आहे. पक्ष पुन्हा एकसंघ राहावा अशी अपेक्षा आहे,” असे त्यांनी सांगितले.
या घडामोडींमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले असून ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय झटका मानला जात आहे.