नवी दिल्ली,
An Air India flight entered Pakistan एअर इंडियाच्या एअरबस ए३२१ विमानासंदर्भात एक गंभीर घटना समोर आली आहे. दिल्ली आणि अमृतसर दरम्यान उड्डाण करणारे एआय-४७९ विमान तांत्रिक बिघाडामुळे नियोजित मार्गावरून भरकटल्याची माहिती समोर आली आहे. या गोंधळात विमान काही काळासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत गेल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या नेव्हिगेशन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली. यामुळे विमानाची दिशा नियंत्रणाबाहेर गेली आणि ते ठरलेल्या मार्गापासून दूर गेले. परिस्थिती गंभीर होताच पाकिस्तानच्या हवाई नियंत्रण विभागाने तत्काळ हालचाली सुरू करत भारतीय अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

यानंतर दोन्ही देशांच्या हवाई नियंत्रण यंत्रणांमध्ये तातडीने समन्वय साधण्यात आला. संभाव्य धोका लक्षात घेऊन विमानाला तात्काळ परतीचे निर्देश देण्यात आले. सुरक्षा कारणास्तव विमानाला अमृतसरऐवजी दिल्लीकडे वळवण्यात आले. विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरले, त्यानंतर तांत्रिक पथकाने विमानाची सखोल तपासणी केली. आवश्यक दुरुस्ती आणि परवानग्या पूर्ण झाल्यानंतरच विमान पुन्हा प्रवासासाठी रवाना करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेमुळे प्रवाशांना सुमारे चार तास प्रतीक्षा करावी लागली. भारत-पाकिस्तान संबंधांतील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता, अशा प्रकारची घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. सध्या नागरी विमान वाहतूक अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून, तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधले जात आहे.