मुंबई
the india story मोस्ट अवेटेड चित्रपट ‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉइजन इन प्रोग्रेस’चा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, देशात वाढत्या कीटकनाशक शेतीच्या (पेस्टिसाइड फार्मिंग) गंभीर परिणामांवर तो प्रकाश टाकतो आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट दररोज लाखो लोकांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या एका वाढत्या धोक्याची कथा मांडतो.
टीझरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या संघर्षाचे प्रभावी आणि भावनिक चित्रण करण्यात आले आहे. न्यायासाठी लढताना ते कीटकनाशक शेतीमागील भयावह वास्तव उघड करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवले आहे. विषारी रसायने कशी हळूहळू आपल्या दैनंदिन आहारात मिसळत आहेत आणि विशेषतः तरुण पिढीच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत, हे टीझरमधून ठळकपणे समोर येते.
चित्रपटाची कथा भावनिक तसेच सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या विषयाला स्पर्श करणारी असल्याचे सांगितले जात असून, अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.
दिग्दर्शक चेतन डीके यांनी या चित्रपटाबाबत बोलताना म्हटले की, ‘द इंडिया स्टोरी’ हा केवळ एक चित्रपट नसून समाजात सुरू करणे आवश्यक असलेला संवाद आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या कथेद्वारे कीटकनाशक शेतीचे चिंताजनक वास्तव आणि त्यातून निर्माण होणारा शांत आरोग्यसंकट यावर प्रकाश टाकण्याचा उद्देश होता. टीझर हा केवळ मोठ्या समस्येची एक झलक असून, तो लाखो कुटुंबांवर दररोज परिणाम करणाऱ्या वास्तवाकडे लक्ष वेधतो. प्रेक्षकांनी त्यांच्या अन्नात नेमके काय आहे, याबाबत विचार करावा आणि प्रश्न उपस्थित करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
श्रेयस तळपदे यांनीही या विषयाच्या महत्त्वावर भाष्य करताना सांगितले की, ‘द इंडिया स्टोरी’ची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिचा समकालीन आणि वास्तवाशी जोडलेला विषय. त्यांच्या मते, आज कीटकनाशक शेती हा प्रत्येक घराशी संबंधित मुद्दा बनला आहे, मात्र त्याच्या दीर्घकालीन परिणामांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. त्यांच्या व्यक्तिरेखेमधून एका सामान्य वडिलांचा संघर्ष दाखवला आहे, जे व्यवस्थेविरुद्ध लढा देतात. हा चित्रपट मनोरंजनासोबतच अत्यंत आवश्यक चर्चेची सुरुवात करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
काजल अग्रवाल the india story यांनीही या चित्रपटाला सामाजिक संदेश देणारा महत्त्वाचा प्रकल्प म्हटले आहे. आई असल्याच्या नात्याने ही कथा त्यांना वैयक्तिक स्तरावर अधिक जवळची वाटल्याचे त्यांनी सांगितले. आज अनेक पालक ज्या चिंता आणि भीतीतून जात आहेत, त्याचे प्रतिबिंब या कथेत दिसते, असे त्यांनी नमूद केले. या टीझरमधून दडलेली वास्तविकता समोर आणली जात असून, प्रेक्षकांनी आपल्या अन्नाबाबत आणि पुढील पिढ्यांच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या चित्रपटाच्या निर्मिती टीममध्ये स्वाती विनायक सैंदाने, अनीता जाधव, विनायक सैंदाने, कल्पेश शाह, देवयानी खोराटे आणि प्रेम जोशी यांचा समावेश आहे. सिनेमॅटोग्राफी निशांत भागवत यांची असून, संगीत मंगेश धाकडे यांचे आहे. संपादन आशीष म्हात्रे यांनी केले असून, गीतकार शकील आझमी आणि साउंड डिझायनर अनमोल भावे या तांत्रिक टीमचा भाग आहेत. ‘जी स्टुडिओज’ आणि एमआयजी प्रोडक्शन अँड स्टुडिओज यांच्या सहकार्याने सादर होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, कथा, लेखन आणि निर्मिती सागर बी. शिंदे यांची आहे.
‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉइजन इन प्रोग्रेस’ हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, तो हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे.
a