वर्धा,
Vegetables in water at the market वर्धेत पावसाच्या पाण्याचा निचरा हा विषय फारच त्रासदायक झालेला आहे. पावसाचे पाणी नाल्यांमध्ये आणि नाल्यांचे पाणी थेट रस्त्यावर येण्याचा अनुभव गेल्या गेल्या दोन दिवसांपासुन वर्धेकर घेत आहेत. काल गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी चक बजाज चौकातील महात्मा जोतिबा फुले बाजारात गुडघाभर पाणी वाहत होते. त्यात उभे राहून दुकानदारांना भाजी विकावी लागली. हा भाजी बाजार समस्यांच्या विळख्यात अडकलेला आहे.
शहरातील मुख्य भाजी बाजारात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे भाजी विक्रेत्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. निचर्याची योग्य व्यवस्था नसल्याने विक्रेत्यांना टोंगळाभर पाण्यात उभे राहून भाजी विकावी लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांनी केला. घटनास्थळी उपस्थित असलेले छायाचित्रकार राहुल तेलरांधे यांनी छायाचित्र टिपले.
टिळक पुतळा परिसरात असलेल्या गोलबाजारातील भाजी विक्रेत्यांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वाराच बाहेरच्या भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या लागत असल्याने भाजी विक्रेत्यांसह भाजी विकत घेण्यासाठी जाणार्यांना त्रास सहन करावा लागतो.