नवी दिल्ली,
kailash yatra परराष्ट्र मंत्रालयाने खाजगी टूर ऑपरेटरच्या माध्यमातून कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. योग्य प्रवास परवानग्या आणि कागदपत्रांशिवाय अशा यात्रेला सुरुवात करू नये, असा स्पष्ट इशारा मंत्रालयाने दिला आहे. अलीकडेच नेपाळमध्ये सुमारे ५२ भारतीय यात्रेकरू अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व प्रवासी खाजगी टूर ऑपरेटरमार्फत कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. मात्र त्यांच्याकडे चीनमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेले व्हिसा आणि अधिकृत परवानग्या उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पुढील प्रवास करता आला नाही. त्यामुळे ते नेपाळमध्येच अडकून पडले आहेत.

या प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालयाकडे अनेक प्रकारच्या मदतविनंत्या प्राप्त झाल्या असून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, योग्य आणि पुष्टी झालेली कागदपत्रे नसताना प्रवास सुरू केल्यास अशा अडचणी निर्माण होऊ शकतात. अनेकदा कागदपत्रे नंतर मिळतील या अपेक्षेवर प्रवास केल्याने प्रवासी परदेशात अडकण्याचा धोका वाढतो, असेही मंत्रालयाने अधोरेखित केले आहे. दरम्यान, नेपाळमधील भारतीय दूतावासाने संबंधित टूर ऑपरेटरशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अडकलेले यात्रेकरू काठमांडूमधील काही हॉटेल्समध्ये थांबले असून त्यांच्या पासपोर्टची प्रक्रिया नवी दिल्लीतील चिनी दूतावासाकडे सुरू आहे. व्हिसा मंजुरी मिळाल्यानंतर त्यांचा पुढील प्रवास शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. केवळ नोंदणीकृत आणि अधिकृत टूर ऑपरेटरमार्फतच अशा धार्मिक यात्रांचे नियोजन करावे, अन्यथा अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा सल्ला मंत्रालयाने दिला आहे. कैलास मानसरोवर हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र तीर्थस्थान मानले जाते. भगवान शिवाचे निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कैलास पर्वत आणि मानसरोवर सरोवराला धार्मिक तसेच आध्यात्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या यात्रेसाठी प्रयत्न करतात.