पुणे
ghat accident पुण्यातून पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली असून, राजगड किल्ल्याच्या पर्यटनासाठी निघालेल्या पर्यटकांच्या ट्रॅव्हल्सला रविवारी पहाटे पाबे घाटात मोठा अपघात झाला. वेल्हा-खानापूर दरम्यान असलेल्या दुर्गम आणि धोकादायक पाबे घाटातील एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, १८ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी परिसरातून 20 जणांचा एक ग्रुप ट्रॅव्हल्स बसने राजगड किल्ला पाहण्यासाठी निघाला होता. सर्व पर्यटक उत्साहात गडकिल्ले भटकंतीसाठी निघाले असतानाच, पुणे जिल्ह्यातील वेल्हा आणि हवेली तालुक्याला जोडणाऱ्या पाबे घाटात त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. पाबे घाटात ट्रॅव्हल्स चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट खोल दरीत कोसळली.या ट्रॅव्हल्स बसमध्ये एकूण 20 प्रवासी होते. दरीत कोसळताच गाडीचा मोठा चक्काचूर झाला. या दुर्घटनेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून इतर काही प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले.ghat accident pune रेस्क्यू टीमने अत्यंत शर्थीचे प्रयत्न करून दरीत अडकलेल्या इतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, घाटमार्गातील धोकादायक वळणांवरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.