टीईटी पेपरफुटीवरून राज्यभर संताप

शिक्षक संघटनांचा आक्रोश

    दिनांक :28-Jun-2026
Total Views |
रायगड/अलिबाग
tet paper leak राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ऐनवेळी रद्द करावी लागल्याने उमेदवार आणि शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष उसळला आहे. पेपरफुटीच्या गंभीर प्रकारामुळे हजारो उमेदवारांची महिनोनमहिन्यांची मेहनत वाया गेल्याची भावना निर्माण झाली असून, संपूर्ण परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
 

 tet paper leak maharashtra 
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमावे, अशी ठाम मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.रविवारी होणारी टीईटी परीक्षा राज्यातील अनेक केंद्रांवर पूर्ण तयारीनिशी आयोजित करण्यात आली होती. उमेदवार परीक्षा केंद्रांजवळील शहरांमध्ये आधीच पोहोचले होते, निवास आणि प्रवासाची व्यवस्था करून तयारी पूर्ण केली होती. मात्र पेपरफुटी उघडकीस आल्यानंतर परीक्षा अचानक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून आर्थिक तसेच मानसिक त्रास झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अनेकांनी प्रशासनाच्या परीक्षा व्यवस्थापनावर तीव्र टीका केली आहे.मध्यवर्ती शिक्षक संघटनेसह विविध संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. परीक्षा प्रक्रियेत वारंवार होणाऱ्या गळतीच्या घटनांमुळे प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी SIT मार्फत व्हावी, तसेच दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे. अन्यथा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
 
 
तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता
दरम्यान, पोलिस तपासात पेपरफुटीचे धागेदोरेtet paper leak  राज्याबाहेरही पसरल्याची माहिती समोर येत आहे. काही संशयितांना अटक करण्यात आली असून, या रॅकेटमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही SIT चौकशीचे आदेश दिले असून, पुढील काही दिवसांत तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.टीईटी परीक्षा शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याने तिच्या पुढील तारखेची प्रतीक्षा उमेदवारांकडून केली जात आहे. परीक्षा कधी होणार, तसेच झालेल्या खर्चाची भरपाई मिळणार का, याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.दरम्यान, प्रशासनाकडून लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.