लखनौ,
up-encounter : उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत पोलीस आणि एसटीएफने मोठी कारवाई करत गुन्हेगारी टोळ्यांविरोधात जोरदार मोहीम राबवली आहे. लखनौ, बहराइच, पिलीभीत, अलीगढ, बदाऊन आणि बुलंदशहर अशा सहा जिल्ह्यांमध्ये एकूण सात वेगवेगळ्या चकमकी झाल्या. या कारवाईत दोन कुख्यात गुन्हेगारांचा मृत्यू झाला असून, अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.
लखनौमध्ये इंदिरा कॅनल रोड परिसरात झालेल्या चकमकीत संजय उर्फ संजीव नावाचा गुन्हेगार ठार झाला. त्याच्यावर 1 लाख रुपयांचे बक्षीस होते. तो एका बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येतील मुख्य आरोपी होता आणि एका टोळीशी संबंधित होता.
पिलीभीतमध्ये झालेल्या चकमकीत शिवम उर्फ सरबजीत या गुन्हेगाराला पोलिसांनी ठार केले. त्याच्यावर 1.75 लाख रुपयांचे बक्षीस होते. तो एका हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी होता. या कारवाईदरम्यान दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले.
बहराइच जिल्ह्यात दोन स्वतंत्र चकमकींत दोन गुन्हेगारांना पकडण्यात आले. फिरोज आणि मुल्कराज अशी त्यांची नावे असून, दोघांवर प्रत्येकी 50 हजार रुपयांचे बक्षीस होते.
अलीगढमध्ये पोलिसांनी फरमान नावाच्या आरोपीला चकमकीनंतर जखमी अवस्थेत अटक केली. त्याच्यावर गोहत्येचा आरोप असून त्याच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली.
बदाऊनमध्ये 4 वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणातील 60 वर्षीय आरोपीला पोलिसांनी चकमकीनंतर जखमी अवस्थेत पकडले. त्याच्या पायात गोळी लागली असून तो उपचाराखाली आहे.
बुलंदशहरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी इरफानला पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली. त्याच्याकडून धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की आरोपींनी गोळीबार केल्यामुळे आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तर दिले गेले. या कारवाईमुळे राज्यातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे.