एआयचा 'वॉच टाइम' प्रायोगिक प्रकल्पाला मंजुरी

    दिनांक :29-Jun-2026
Total Views |
मुंबई
mumbai ai आगामी गणेशोत्सवात नागरिकांच्या सुरक्षिततेला अधिक बळकटी देण्यासाठी मुंबई महापालिकेने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित गर्दी निरीक्षण प्रणालीचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत शहरातील प्रमुख पर्यटनस्थळे आणि धार्मिक ठिकाणी अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानयुक्त कॅमेरे बसवून गर्दीवर रिअल-टाइममध्ये लक्ष ठेवण्यात येणार आहे.
 

mumbai ai crowd monitoring system 
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गेटवे ऑफ इंडिया, सिद्धिविनायक मंदिर, जुहू बीच, दादर बीच आणि गिरगाव चौपाटी या प्रमुख ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. येथे बसविण्यात येणारी प्रणाली पर्यटक, भाविक आणि इतर नागरिकांची संख्या, गर्दीची तीव्रता, हालचालींचे स्वरूप आणि विविध वेळांतील गर्दीचा कल यांचे सविस्तर विश्लेषण उपलब्ध करून देणार आहे.मुंबईत सध्या सुमारे दहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असले तरी ते केवळ देखरेखीपुरते मर्यादित आहेत. नव्या एआय प्रणालीमुळे निरीक्षणाबरोबरच गर्दीचे विश्लेषण, संभाव्य धोके ओळखणे आणि तातडीने निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती प्रशासनाला उपलब्ध होणार आहे. प्रकल्पाचा खर्च, तांत्रिक आराखडा आणि अंमलबजावणीची रूपरेषा निश्चित करण्यासाठी सविस्तर अहवाल तयार केला जाणार असून त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल.हा प्रस्ताव मांडणारे भाजपचे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी सांगितले की, सध्या रिअल-टाइम गर्दीविषयक माहिती उपलब्ध नसल्यामुळे स्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, वाहतूक व्यवस्थापन, नागरी सुविधा आणि सुरक्षा राखताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे किमान पाच प्रमुख पर्यटन आणि धार्मिक स्थळांवर mumbai ai  एआय-आधारित सीसीटीव्ही प्रणालीचा प्रायोगिक वापर करण्यात येणार आहे.
त्यांच्या मते, या तंत्रज्ञानामुळे सार्वजनिक सुरक्षेत वाढ होण्यासोबतच वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल, नागरी सेवा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने देता येतील आणि मुंबईच्या स्मार्ट सिटी उपक्रमालाही चालना मिळेल.सध्या शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेवर आपत्ती व्यवस्थापन विभाग नियंत्रण ठेवत आहे. नव्या प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास विविध भागांत स्थानिक वॉर रूम्स उभारण्याचाही विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलीस दलाचे नियोजन अधिक परिणामकारक होईल, गर्दीवर नियंत्रण ठेवणे सुलभ होईल आणि विशेषतः सण-उत्सवांच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेत आणखी वाढ होईल, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.