वर्धा,
protest-march : आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आज सोमवार २९ रोजी स्थानिक बजाज चौकातून शेकडोंच्या संख्येने मोर्चा काढला. हा मोर्चा बजाज चौक, झांसी राणी चौक असा मार्गक्रमण करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
अनुसूचित जातीतील ५९ जातींकरिता मान्य असलेल्या आरक्षणात राज्य सरकारने उपवर्गीकरण करण्यासाठी नियुक्त केलेली बदर समितीचा अहवाल जाहीर न करता हरकती मागविल्यामुळे सरकारने राज्यातील अनुसूचित जातींमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. आरक्षणापासून वंचित घटकाला न्याय देण्याच्या उद्देशाने उपवर्गीकरणाचा निर्णय म्हणजे राजकीय लाभ मिळवण्याचा हेतू आहे. या निर्णयाला आंबेडकरी संघटनांसह अन्य संघटनांनी विरोध दर्शवला असून आरक्षण उपवर्गीकरणा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
वंचितांना आरक्षणाचा लाभ द्यायचा असेल तर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्याकरिता वस्त्यांमध्ये सोयीसुविधायुक्त बालमंदिर, कॉन्व्हेंट निर्माण करावे, प्रशिक्षित शिक्षक नेमण्यात यावा, पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाकरिता आश्रमशाळा, प्रत्येक जिल्ह्यात नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर निर्माण कराव्या, उच्च शिक्षणासाठी सर्व सुविधा बार्टीच्या धर्तीवर त्यांचे शिक्षण प्रशिक्षणाची व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात यावी, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्त्व डॉ. भदन्त राजरत्न आणि विशाल मानकर यांनी केले. मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडोंची उपस्थिती होती.