वाशीम,
adulterated-products-openly-sold : वाशीम जिल्ह्यात आठवडी बाजारात तसेच स्थानिक दुकानातून विक्री होत असलेल्या खाद्यपदार्थात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असतांना अन्न व औषधी प्रशासन हे धृतराष्ट्राच्या भूमीकेत आपले कर्तव्य बजावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी सर्वस्तरातून पुढे येत आहे.

अन्न व औषधी प्रशासनाच्या वतीने राज्यातील अनेक ठिकाणी धडक कारवाई करत भेसळखोरावर कारवाई केली. त्यामुळे भेसळखोरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रत्येक ग्राहक हा आता भेसळयुक्त पदार्थां विषयी सावध झाला आहे. आज घडीला बाजार पेठेत रासायनिक पध्दतीने पिकविलेल्या फळांची खुलेआम विक्री होत आहे. किराणा दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थात भेसळीचे प्रमाण आहे. तसेच मुदबाह्य पदार्थाची देखील विक्री होत आहे. जिल्ह्यात दुधाचे उत्पादन कमी असले तरी त्यामध्ये भेसळ करुन दुध विक्री होत आहे. जिल्ह्यात शेकडो व्यापारी हळद-मसाले, विक्री करतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केल्या जाते. बहुतांश खाद्यपदार्थात भेसळ केल्या जात असल्याचे दिसून येत असले तरी या गंभीर प्रकरणाकडे अन्न व औषधी प्रशासन कारवाईसाठी पुढे येत नसल्याने भेसळखोरांचे चांगले फावले आहे.
जिल्ह्यात आठवडी बाजारात अनेक व्यापारी हळद, मिरची, मसाला यासह उघड्यावर खाद्य तेल विक्री, किराणा सामानाची विक्री करतांना दिसून येतात. हळद, मसाला, मिरची यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करुन विक्री केल्या जाते. तसेच खाद्य तेलाची कुठेही शुध्दता दिसून येत नाही. आठवडी बाजारात विकल्या जाणार्या विविध प्रकारच्या डाळीमध्ये भेसळ करुन विक्री केल्या जात असली तरी प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.