चंद्रपूर,
pramod-bapat : ‘न सा सभा यत्र न सन्ति वृध्दा...’, असा देवश्री नारद यांचा श्लोक आहे. त्यात ते म्हणतात, ती खरी सभा नव्हे, जेथे अनुभवी ज्येष्ठ (वृध्द) नसतात. ते खरे ज्येष्ठ नव्हेत, जे धर्माचे बोलत नाहीत. तो खरा धर्म नव्हे, ज्यात सत्य नाही आणि ते खरे सत्य नव्हे, जे कपट आणि खोटेपणाने माखले आहे. त्यामुळे आपल्या बातमीतील सत्य पूर्ण आणि ठाम असले पाहिजे, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांनी येथे दिला.
विश्व संवाद केंद्राच्या चंद्रपूर विभागातर्फे देवर्षी नारद जयंतीचा कार्यक्रम मंगळवार, 2 जून रोजी चंद्रपुरातील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मुरलीमनोहर व्यास, तर प्रमुख वक्ता म्हणून प्रमोद बापट उपस्थित होते.
बापट म्हणाले, घाईगर्दीतही बातमी अपूर्ण व असत्य रूपात समाजासमोर जाऊ शकते. आजच्या द्दक-श्राव्य आणि समाजमाध्यमांच्या स्पर्धेत तर अनेकदा हे घडते. मात्र, आपल्या पूर्वसुरींनी जो आदर्श घालून दिला तो आजच्या पत्रकारांनी पाळला पाहिजे. जोवर पूर्ण सत्य असल्याची खात्री पटत नाही, तोवर ती बातमी किंवा माहिती समाजात जाता कामा नये. सोबतच आजरोजी नकारात्मक बातम्या वाढल्या आहेत. समाजाला ते आवडतात म्हणून त्या दिल्या जात नाही, तर नकारात्मक दिल्याने लोक वाचतात, असा समज केला गेला आहे. खरे तर, सकारात्मक, विकासात्मक बातमीही समाजाला आवडते. ती दिली पाहिजे. आजच्या पत्रकारांसाठी देवश्री नारदांचे आदर्श प्रेरणादायी आहे. संदेशवहन आणि तोही सकारात्मक आणि समजाकल्याणाचा असावा, असेही बापट म्हणाले.
मुरलीमनोहर व्यास यांनी, देवर्षी नारद यांची प्रतिमा सिनेमावाल्यांनीं कळ लावणारा अशी करून ठेवली आहे. प्रत्यक्षात ते आद्य पत्रकार आहेत. त्यांनी देव व दानवांकडे जे घडले ते पोहचवले. कधीही असत्य किंवा अर्धसत्य प्रसुत केले नाही.
यावेळी गडचिरोलीतील ज्येष्ठ पत्रकार अविनाश भांडेकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक चंद्रपूर जिल्हा प्रसार प्रमुख कपीश उजगावकर यांनी, तर आभार प्रदर्शन विभाग प्रचार प्रमुख विजय एंगलवार यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.