आर्वी,
setu bandh agitation starts today आपले सरकार केंद्र व आधार केंद्र संघटन यांच्या विविध समस्या बाबत शासकीय स्तरावरुन शासनाने कोणतीही दखल न घेतल्याने राज्यातील सर्व महा ई सेवा व आधार सेवा केंद्र बुधवार १ जुलैपासून बंद राहतील व आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन केले जाईल, अशा इशारा प्रमोद बरडे यांचे अध्यक्षतेखाली सेतू चालकांनी उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून शासनाला दिला.

महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल सेवा ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षापासून केंद्र चालकांना विविध प्रशासकीय व अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संघटनेच्या माध्यमातून प्रशासकीय स्तरावरुन अनेक निवेदने देऊन पत्रव्यवहार केलेला आहे. परंतू शासनाने यांची नोंद घेतलेली नाही. न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली व तीन दिवसाचा लक्षणीय संप करावा लागला होता. त्यावेळी ८ दिवसांत समस्या निकाली काढू असे आश्वासन दिले. परंतु, कार्यवाही केली नसल्याने काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. निवेदन देतेवेळी प्रमोद बरडे, अनंत झाडे, स्वप्निल मांगे, दिनेश राऊत, दादाराव पाचोडे, नितीन ढोले, संजय काळबांडे, रोशन माटे, अमित सेलोकार आदी सदस्य उपस्थित होते.