मुंबई,
tukaram-mundhe : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्य व्यवसायांवर धडक कारवाई करत सहा मोठ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरींचे परवाने निलंबित केले आहेत. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, अस्वच्छता आणि मुदतबाह्य खाद्यसाठा आढळल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
एफडीएच्या पथकाने नरिमन पॉइंटसह बोरीवली, सांताक्रूझ, अंधेरी, वांद्रे आणि भांडुप परिसरातील विविध आस्थापनांवर छापे टाकले. तपासणीदरम्यान काही ठिकाणी स्वयंपाकघरात अस्वच्छता, झुरळे-उंदरांचा वावर, मुदतबाह्य अन्नसाठा तसेच आवश्यक कागदपत्रांचा अभाव आढळून आला. काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने अन्नसाठा ठेवण्यात आल्याचेदेखील समोर आले.
या कारवाईमुळे मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा एफडीएने दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.