मुंबई
Legislative Council election राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना मोठा वेग आला. या निवडणुकीत महायुतीमध्ये काही ठिकाणी बंडखोरीचे संकेत दिसून आले होते, मात्र अखेरच्या क्षणी समन्वय साधत ही बंडखोरी नियंत्रणात आणण्यात महायुतीला यश आले असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीला दोन महत्त्वाच्या जागांवर मोठा धक्का बसला आहे. ऐनवेळी उमेदवारांनी पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेता निवडणुकीतून माघार घेतल्याने आघाडीच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.रत्नागिरी–सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने बाळ माने यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी शेवटच्या क्षणी निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर–जालना मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि ठाकरे गटाच्या नेत्या देवयानी डोनगावकर यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे.
या घडामोडींनंतर Legislative Council election जळगाव मतदारसंघातही अशीच स्थिती निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे गटाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. जळगाव विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार शरद तायडे यांना थेट मुंबईत बोलावून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उमेदवारी माघारीचा कोणताही धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.या प्रक्रियेत ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे समजते. सत्ताधाऱ्यांकडून दबाव किंवा संभाव्य माघारीचा धोका लक्षात घेऊन उमेदवाराला मुंबईत ठेवण्यात आले होते. या काळात जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांचीही उपस्थिती होती.
अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्यानंतर शरद तायडे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबतचा फोटो समाजमाध्यमावर शेअर केल्याने या घडामोडींना आणखी राजकीय रंग चढला आहे. दरम्यान, या सर्व घटनाक्रमाला ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांकडून दुजोरा मिळाल्याचेही सांगितले जात आहे.एकूणच विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार माघारी, अंतर्गत तणाव आणि राजकीय डावपेच यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून पुढील टप्प्यातील मतदान प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.