नवी दिल्ली,
ishq-karo-party : सध्या सोशल मीडियावर सीजेपी, म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, आणखी एक नवीन पक्ष उदयास येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी 'इश्क करो पार्टी' सुरू करण्याची घोषणा केली आहे. ते या नवीन उपक्रमाचे संरक्षक असून त्यांनी सदस्य नोंदणी मोहीमही सुरू केली आहे.
माजी न्यायाधीशांनी 'x' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करून लोकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी लिहिले, "इच्छुक लोक अधिकृत ईमेल पत्त्यावर संपर्क साधू शकतात:
ishqkaroparty@gmail.com."
"देशाच्या गंभीर समस्या सोडवण्यासाठी एक मोठा प्रयत्न"
मार्कंडेय यांनी स्पष्ट केले की, अनेक लोक याला एक विनोद किंवा व्हॅलेंटाईन डे सारखा उपक्रम समजत आहेत, जो मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेमसंबंधांना प्रोत्साहन देतो, पण ते पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी स्पष्ट केले की, देशाच्या गंभीर समस्या सोडवण्यासाठी हा एक मोठा प्रयत्न आहे. गरिबी, बेरोजगारी, मुलांमधील कुपोषण, महागडे शिक्षण, निकृष्ट आरोग्यसेवा आणि महागाई यांसारख्या समस्या जनएकतेशिवाय सोडवता येणार नाहीत. कटजू यांच्या मते, आज आपला समाज जात आणि धर्माच्या आधारावर विभागलेला आहे. राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी आणि व्होट बँकेसाठी या द्वेषाला प्रोत्साहन देतात. हा द्वेष दूर करून लोकांमध्ये प्रेम आणि ऐक्य वाढवणे हे 'इश्क करो पार्टी'चे ध्येय आहे.
'कॉकरोच जनता पार्टी'च्या संस्थापकावर निशाणा साधला
आपल्या पोस्टमध्ये काटजू यांनी 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावरही टीका केली आहे. वास्तविक, अभिजीत दीपके यांनी देशातील स्पर्धा परीक्षांमधील अनियमिततेच्या विरोधात ६ जून रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे एक मोठे आंदोलन आयोजित केले होते आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर निशाणा साधत काटजू म्हणाले की, भारताचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही अभिजीत दीपके यांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक आहे, यावरून त्यांचा मूर्खपणा स्पष्ट दिसतो. पण त्यांनी राजीनामा दिला तरी त्यांच्या जागी दुसऱ्या मंत्र्याची नियुक्ती केली जाईल. त्याने काय फरक पडणार आहे?