पाणी आणि पुनर्वसनाची प्रतीक्षा
सेलू,
Bor Tiger Reserve तालुयातील बोर व्याघ्र प्रकल्पामुळे बाधित ठरलेल्या गरमसूर गावाला धरण उशासी आणि कोरड घश्याला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणासाठी जागा दिलेल्या गरमसूर गाव सध्या पाणीटंचाईने त्रस्त आहे सोबतच पुनर्वसनाची त्यांना प्रतीक्षा आहे. या दुहेरी संकटात गरमसूर थंड झाले आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावासाठी लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना परिणामकारक नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे. नागरिकांना नियमित आणि पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी, अनेक कुटुंबांना दूरवर विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्त्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. पाण्यासाठीच्या संघर्षामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे, बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गाव म्हणून पुनर्वसनाची प्रक्रिया देखील अद्याप पूर्णत्वास न गेल्याने ग्रामस्थांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तसेच सेलूच्या तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांच्याकडे निवेदनाद्वारे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.