कुशीनगर,
Kushinagar Murder Case उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील सेवारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. प्रेमसंबंधांना विरोध करत एका वडिलांनी आपल्या दोन मुलांसह दोन तरुण मुलींची हत्या केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे.
पिप्राघाट देव नारायण टोला येथील एका कुटुंबातील दोन बहिणी गावातीलच दोन तरुणांशी प्रेमसंबंधात असल्याचे सांगितले जाते. काही महिन्यांपूर्वी त्या दोघी घर सोडून गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शोधमोहीम राबवून दोन्ही मुलींना शोधून काढले आणि त्यांना कुटुंबाच्या स्वाधीन केले होते.
घरी परतल्यानंतर मुलींवर विविध निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, त्या अजूनही संबंधित तरुणांच्या संपर्कात असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळत होती. यामुळे घरात वारंवार वाद निर्माण होत होते. मंगळवारी रात्री पुन्हा एकदा मुली मोबाईलवर बोलत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर घरातील वातावरण तापले.
याच वादातून संतापलेल्या वडिलांनी आणि त्यांच्या मुलांनी दोन्ही बहिणींना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मुलींचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी वडील फरार झाले, तर पोलिसांनी तातडीने दोन्ही भावांना ताब्यात घेतले.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. प्राथमिक तपासात ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचे समोर येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दुहेरी हत्येमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.