अभिषेक बॅनर्जींच्या घरावर हल्ल्याचा दावा!

बंगालमध्ये राजकीय खळबळ

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
कोलकाता,
attack on Abhishek Banerjee's residence पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांच्या घरावर हल्ला झाल्याचा गंभीर आरोप करत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी दावा केला की, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरावर दगडफेक केली.अभिषेक बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सकाळी ३० जून रोजी एका बाईकस्वार व्यक्तीने त्यांच्या कुटुंबाच्या घराबाहेर येत पहिल्या मजल्यावरील खिडक्यांवर दगडफेक केली. या हल्ल्यात खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यांनी या घटनेला केवळ सुरक्षा यंत्रणेचे अपयश नसून राज्यातील वाढत्या हिंसक वातावरणाचे गंभीर उदाहरण म्हटले आहे.
 
 

Abhishek Banerjee 
 
या घटनेनंतर बॅनर्जी यांनी प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवरही तीव्र प्रश्न उपस्थित केले. घटना घडत असताना पोलीस कुठे होते आणि हल्लेखोराला कोणाचा पाठिंबा होता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यात गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसचे खासदार असलेल्या बॅनर्जी यांनी भाजपवर थेट निशाणा साधला. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार आणि गुंडगिरीला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या धोरणांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना बळ मिळत असल्याचे त्यांनी म्हटले.
 
 
 
यावेळी त्यांनी नुकत्याच मंजूर झालेल्या ‘पश्चिम बंगाल सार्वजनिक सुरक्षा आणि समाजविघातक कृत्ये नियंत्रण विधेयक, २०२६’ चा देखील उल्लेख केला. या कायद्याची अंमलबजावणी सर्वांवर समानपणे होणार का, विशेषतः सत्ताधारी पक्षाशी संबंधित लोकांवरही कारवाई होईल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत अभिषेक बॅनर्जी यांनी बंगालमध्ये वाढता हिंसाचार ही गंभीर बाब असल्याचे म्हटले. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.