दोन देश एक आवाज...'वैर थांबवा, संवाद वाढवा'

117 मान्यवरांचे मोदी-शहबाज यांना पत्र

    दिनांक :01-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Letter to Modi and Shahbaz भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांतील एकूण 117 प्रमुख व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना संयुक्त पत्र लिहिले आहे. या पत्रातून संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारून द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या पत्रावर भारतातील 61 आणि पाकिस्तानातील 56 मान्यवरांनी स्वाक्षरी केली आहे. भारताकडून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती तसेच राजद खासदार मनोज झा यांचा समावेश आहे. पाकिस्तानकडून माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांसह अनेक माजी अधिकारी आणि सामाजिक-राजकीय व्यक्तींनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.
 
 
 
 Shahbaz
 
पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, दक्षिण आशियामध्ये शांतता, स्थैर्य आणि विकासासाठी दोन्ही देशांनी पुन्हा एकदा संवाद सुरू करणे अत्यावश्यक आहे. दीर्घकाळापासून थांबलेला द्विपक्षीय संवाद पुन्हा सुरू झाल्यास व्यापार, संस्कृती, शिक्षण आणि लोकांमधील संपर्क वाढू शकतो, असेही यात म्हटले आहे.गेल्या काही वर्षांपासून भारत-पाकिस्तान संबंध सतत तणावपूर्ण राहिले आहेत. 2016 मधील पठाणकोट हल्ल्यानंतर व्यापक चर्चा प्रक्रिया ठप्प झाली होती. 2019 मध्ये कलम 370 रद्द झाल्यानंतर संबंध आणखी बिघडले आणि दोन्ही देशांनी राजनैतिक हालचालींवर मर्यादा आणल्या. त्यानंतर नियंत्रण रेषेवरील संघर्षविराम करार पुन्हा लागू करण्यात आला असला तरी सीमापार तणाव कायम आहे.
 
2025 मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये व्हिसा सेवा आणि नागरिकांची हालचाल यावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादण्यात आले. हवाई हद्द बंद होणे, थेट विमानसेवा स्थगित होणे, सांस्कृतिक आणि क्रीडा संबंध थांबणे यामुळे दोन्ही देशांतील संपर्क जवळजवळ थांबला आहे. या पार्श्वभूमीवर या 117 मान्यवरांच्या पत्रामुळे पुन्हा एकदा संवादाच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सध्याच्या राजकीय आणि सुरक्षा परिस्थितीत या आवाहनाला दोन्ही सरकारांकडून काय प्रतिसाद मिळतो, याकडे संपूर्ण दक्षिण आशियाचे लक्ष लागले आहे.