गौतमबाबत बीसीसीआय झाली 'गंभीर'

    दिनांक :10-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
BCCI gets serious about Gautam इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यातील पराभवानंतर भारताने पाच सामन्यांची मालिका गमावली असून, या निकालामुळे भारतीय क्रिकेटमध्ये नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाला इंग्लंडविरुद्ध मालिका वाचवण्यात अपयश आले. विशेष म्हणजे, भारताच्या टी-२० क्रिकेट इतिहासात इंग्लंडविरुद्ध दोनपेक्षा अधिक सामन्यांची द्विपक्षीय मालिका गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. तसेच २०१९ नंतर इंग्लंडविरुद्धचा हा पहिला द्विपक्षीय मालिका पराभव आहे.या सलग अपयशानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यपद्धतीबाबत बीसीसीआयमध्ये चर्चा सुरू झाली आहे. गंभीर यांचा करार २०२७ पर्यंत असला, तरी संघाच्या सध्याच्या कामगिरीचा आढावा घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतल्याची माहिती समोर आली आहे. केवळ प्रशिक्षकच नव्हे, तर संपूर्ण सहाय्यक प्रशिक्षकांच्या कामाचेही मूल्यमापन केले जाणार असल्याचे वृत्त आहे.
 
 
 
gambhir
 
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय सध्या कोणताही घाईघाईचा निर्णय घेणार नसला, तरी संघ संक्रमणाच्या टप्प्यात असल्याचे कारण कायमस्वरूपी स्वीकारले जाणार नाही, अशी भूमिका बोर्डाने घेतली आहे. आगामी काळात कर्णधार आणि प्रशिक्षक या दोघांनाही संघाची कामगिरी उंचावून दाखवावी लागणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.काही दिवसांपूर्वी गौतम गंभीर यांनी संघाच्या कामगिरीचे समर्थन करताना सध्याचा भारतीय संघ आणि टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळलेला संघ यामध्ये मोठा फरक असल्याचे सांगितले होते. कर्णधारापासून सलामीवीरांपर्यंत अनेक बदल झाले असून, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहसारखे अनुभवी खेळाडू संघात नसल्याचे त्यांनी नमूद केले. नव्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावण्यासाठी वेळ लागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
 
दरम्यान, चौथ्या सामन्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर यांनीही संघ सध्या बदलाच्या प्रक्रियेतून जात असल्याचे सांगितले. या काळात चुका होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी मान्य केले आणि नव्या परिस्थितीशी जुळवून घेणे संघासाठी महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. सध्या गौतम गंभीर यांच्या पदावर कोणताही तातडीचा धोका नसला, तरी सलग पराभवानंतर बीसीसीआयने कामगिरीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतल्याने आगामी काळात प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यावर चांगली कामगिरी करण्याचे मोठे दडपण असणार आहे.बीसीसीआय